मुंबई. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाच्या फलंदाजांनी रविवारी वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. प्रथम, फिल सॉल्ट (78) आणि विराट कोहली (50) बाद झाले आणि सॉल्ट बाद झाल्यानंतर, कर्णधार रजत पाटीदारने (53) धावांची वादळी खेळी करत मुंबईला त्यांच्याच घरच्या मैदानावर नामुष्की आणण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.
सलग दुसऱ्या सामन्यात, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेला मुंबईचा गोलंदाजीचा मारा सामान्य वाटला. पाटीदारने अवघ्या 17 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले, जे आरसीबीच्या खेळाडूने केलेले संयुक्तपणे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. आघाडीच्या फळीतील स्फोटक कामगिरीच्या जोरावर, आरसीबीने चार गडी गमावून 240 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्स पाच गडी गमावून केवळ 222 धावाच करू शकली आणि आरसीबीने 18 धावांनी विजय मिळवला.
मुंबईचा सलग तिसरा पराभव तर आरसीबीचा तिसरा विजय?
या मोसमात आरसीबीचा हा तिसरा विजय आहे, तर मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा पराभव आहे. गेल्या आठ सामन्यांमधील मुंबई इंडियन्सविरुद्धचा आरसीबीचा हा सहावा विजय आहे. पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, त्यांची रणनीती आता चालत नाहीये आणि त्यांना मोठे बदल करण्याची गरज आहे. मुंबईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, सॉल्ट आणि कोहलीने 120 धावांची सलामीची भागीदारी करून आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली.
कोहलीने ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर एक शानदार षटकार मारून आपला इरादा स्पष्ट केला. दरम्यान, सॉल्टने बोल्ट आणि हार्दिकच्या गोलंदाजीवर मोठे फटके लगावले. त्याने सँटनरच्या एकाच षटकात सलग तीन षटकार मारून गोलंदाजांवर दबाव आणला. बंगळूरने पॉवरप्लेमध्ये 71 धावा केल्या होत्या. मुंबईला जसप्रीत बुमराहला लवकर गोलंदाजीसाठी परत बोलवावे लागले, पण तोपर्यंत आरसीबीने आघाडी घेतली होती.
आठव्या षटकात सॉल्टने मयंक मार्कंडेच्या गोलंदाजीवर सलग तीन चौकार मारले, तर कोहलीनेही सँटनरला लक्ष्य केले. शार्दुलने अखेरीस सॉल्टला बाद करून ही भागीदारी तोडली. त्यानंतर पाटीदारने सूत्रे हाती घेतली आणि मार्कंडेच्या एकाच षटकात तीन षटकार ठोकले. त्याच्या या खेळीने सामन्याचे चित्र पूर्णपणे आरसीबीच्या बाजूने पालटले. कोहलीने 39 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले, पण 15 व्या षटकात तो बाद झाला. अखेरीस, सँटनरने पाटीदारला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले, पण तोपर्यंत त्याने २० चेंडूंमध्ये 53धावा केल्या होत्या. टीम डेव्हिडने 16 चेंडूंमध्ये 34 धावांची खेळी केली.

रोहित रिटायर्ड हर्ट अने सामना तिथंच फिरला -
मुंबईनेही दमदार सुरुवात केली. रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा यांनी पाच षटकांत 57 धावा जोडल्या, पण सहाव्या षटकात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहितला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. रिटायर्ड झाला तेव्हा रोहित 19 धावांवर खेळत होता. रसिक दारने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर रिकल्टनने एक धाव घेतली. रोहितने पुढचा चेंडू खेळला आणि दुखापतीमुळे मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
त्यानंतर मुंबईच्या विकेट्स नियमित अंतराने पडल्या. शेफ्रान रदरफोर्डने 31 चेंडूंमध्ये नऊ षटकारांसह 71 धावांची नाबाद खेळी करून संघाला 200 धावांच्या पुढे नेले असले तरी, विजय मिळवण्यासाठी ते पुरेसे नव्हते. हा एक असा दुर्मिळ सामना होता, ज्यात रोहित आणि विराट जखमी किंवा आजारी दिसले. विराटने दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण केले नाही. समालोचनात रवी शास्त्री असे म्हणताना ऐकू आले की, विराटला ताप होता.
गोलंदाजीतील फरक स्पष्ट दिसला-
मुंबईची गोलंदाजी सामान्य वाटत होती. बुमराहला सलग चौथ्या सामन्यात एकही बळी घेता आला नाही आणि इतर गोलंदाजांनी धावा दिल्या. दव असतानाही कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि रसिक दार यांनी संयमाने गोलंदाजी केली. सुयश थोडा महागडा ठरला, पण त्याने तिलक वर्मा आणि रिकल्टन यांच्या दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
