जेएनएन, बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे. या भेटीत सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी गळ घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

वरिष्ठ नेत्यांची बंद खोलीत चर्चा!

अंत्यसंस्कारानंतर लगेचच राजकीय हालचाली सुरू असून, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी बारामतीत सुनेत्रा पवार यांची बंद खोलीत भेट घेतली. अजित पवार यांच्या अचानक निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी, पक्षाची पुढील दिशा आणि सरकारमधील प्रतिनिधित्व यावर या चर्चेत सविस्तर संवाद झाल्याचं समजतं.

माहितीनुसार, अजित पवार यांच्या जागी उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे करण्यावर या नेत्यांमध्ये एकमत झालं आहे. यासंदर्भात सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर प्रस्ताव ठेवण्याबाबतही चर्चा झाल्याचं कळतं.

सत्ताधारी पक्षांशी लवकरच संवाद?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सध्या सरकारमधील महत्त्वाचा घटक पक्ष आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद कोण सांभाळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पक्षातील बहुतांश वरिष्ठ नेत्यांचा कल सुनेत्रा पवार यांच्याकडे असल्याचं चित्र आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) नेतृत्वाशी यासंदर्भात औपचारिक चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरण्याची शक्यता

    सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं, तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील. त्यामुळे हा निर्णय केवळ राजकीयच नव्हे, तर ऐतिहासिक ठरेल. विशेष म्हणजे, आतापर्यंत त्या सक्रिय राजकारणापासून काहीशा दूर होत्या. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत पक्षाची सूत्रे कुटुंबाबाहेर जाऊ नयेत.संघटना सावरता यावी, यासाठी त्यांच्याकडे जबाबदारी देण्याचा सूर पक्षात जोर धरताना दिसतोय.

    पक्षातील हालचाली वाढल्या!

    दरम्यान, अजित पवार गटातील अनेक आमदार, पदाधिकारी आणि जिल्हास्तरीय नेते बारामतीत दाखल होत असून, नेतृत्वाबाबत स्वतंत्रपणे बैठका सुरू आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्रीपद, तर दुसरीकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाबाबतही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

    अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)समोर नेतृत्वाचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येणं हे केवळ भावनिक नाही, तर राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचं मानलं जात आहे.