जेएनएन, नागपूर. नागपूर महानगरपालिका व सह्याद्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेला ‘आस्था भिक्षेकरी पुनर्वसन निवारा केंद्र’ हा उपक्रम समाजातील वंचित घटकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. यातच आता नागपूर येथील तीन पुनर्वसित लाभार्थ्यांना 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास देशभरातून निवडलेल्या 100 विशेष आमंत्रितांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचे पुढ़ाकारातुन व अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी तसेच उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु असून, सन 2022 पासून या उपक्रमांतर्गत 1330 हून अधिक भिक्षेकऱ्यांचे बचाव, पुनर्वसन व समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्समावेशन करण्यात आले आहे.
निवारा, आरोग्यसेवा, समुपदेशन, कौशल्य विकास वरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना सन्मानाचे जीवन जगण्याची संधी देण्यात आली आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, नागपूर येथील तीन पुनर्वसित लाभार्थ्यांना 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास देशभरातून निवडलेल्या 100 विशेष आमंत्रितांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
निवड झालेले लाभार्थी पुढीलप्रमाणे:
- शरीफ शेख (वय : 61 वर्षे)
- अनिल जुनघरे (वय : 52 वर्षे)
- गायाबाई शुक्ला (वय : 70 वर्षे)
नागपूर महानगरपालिका व सह्याद्री फाउंडेशन यांच्या वतीने सांगण्यात आले की, ‘आस्था’ व स्माइल उपक्रम हा भिक्षेकरीमुक्त, सर्वसमावेशक आणि सशक्त समाजनिर्मितीच्या भारत सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असून, पुनर्वसनाच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना आत्मनिर्भर बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे.
राष्ट्रीय पातळीवरील या महत्त्वाच्या कार्यक्रमात पुनर्वसित लाभार्थ्यांचा सहभाग हा शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांचा यशस्वी परिणाम आहे. या लाभार्थ्यांसोबत कार्यालयीन प्रतिनिधी गौतम नागरे वार्डन, राकेश गाठे व्यवस्थापक व अनिता गंधर्वार अधीक्षिका देखील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
