छत्रपती संभाजीनगर. शहरातील भावसिंगपुरा परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. केवळ जेवणात केस सापडल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाने अखेर एका 25 वर्षीय विवाहितेचा जीव घेतला आहे. सततचा मानसिक आणि शारीरिक छळ सहन न झाल्याने संबंधित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना भावसिंगपुरा येथील श्रावस्ती कॉलनी परिसरात घडली. माहितीनुसार, जेवणात केस सापडल्याच्या कारणावरून पतीने महिलेला अमानुष मारहाण केली. या घटनेनंतर सासरच्या मंडळींकडूनही तिला वारंवार त्रास दिला जात होता. किरकोळ कारणावरून सुरू झालेला छळ दिवसेंदिवस वाढत गेला आणि अखेर महिलेने टोकाचा निर्णय घेतला.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी छावणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मृत महिलेचा पती आणि सासरच्या एकूण सात जणांना अटक केली आहे.

पोलीस अधिक तपास करत असून, या घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी आणि छळाचे स्वरूप उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे.