छत्रपती संभाजीनगर, (एजन्सी) - परभणी महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या (यूबीटी) उमेदवाराकडून अवघ्या एका मताने पराभूत झालेल्या भाजप उमेदवाराने स्थानिक न्यायालयात आपल्या प्रभागात पुनर्मतदान घेण्याची मागणी केली आहे आणि निवडणूक प्रक्रियेत विसंगती असल्याचा आरोप केला आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी झाल्या आणि दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर झाले.

परभणीतील प्रभाग 1 अ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे उमेदवार व्यंकट डहाळे यांना 4,312 मते मिळाली, तर भाजपचे प्रसाद नागरे यांना 4,311 मते मिळाली, म्हणजे दोघांमध्ये फक्त एका मताचा फरक होता.

त्याच प्रभागात शिवसेनेचे उमेदवार मोहन सोनवणे यांना 1,363 मते मिळाली, तर 113 मतदारांनी 'नोटा' हा पर्याय निवडला.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना, नागरे यांनी त्यांच्या प्रभागात राज्य निवडणूक आयोगाने (एसईसी) घेतलेल्या मतदान प्रक्रियेत विसंगती असल्याचा आरोप केला. मी एसईसीकडे तक्रार दाखल केली आहे आणि न्यायालयातही धाव घेतली आहे. एसईसीने केलेल्या प्रक्रियेत बरीच विसंगती होती, असा आरोप त्यांनी केला.

"पोस्टल मतदान ही फक्त निवडणूक कर्तव्यावर असलेल्यांसाठीच तरतूद आहे... पण किराणा दुकानाच्या मालकालाही या पद्धतीने मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला आणि त्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता.

विरोधकांच्या नातेवाईकांनी दोन मतदान केंद्रांवर मतदान केल्याचा आरोपही त्यांनी केला.

    वॉर्ड 1 ड मधील भाजपचे आणखी एक उमेदवार दत्ता रेंगे यांनी मतदानाच्या निकालावर आक्षेप घेतला आणि निवडणूक आयोग तसेच न्यायालयात धाव घेतली आणि मतांच्या संख्येत तफावत असल्याचा आरोप केला.

    "मला एकाच दिवशी दोन निकालपत्रिका मिळाल्या आणि दोन्ही पत्रकांमध्ये 246 मतांचा फरक आहे. मी एसईसीकडे आक्षेप नोंदवला आहे. आम्ही येथील न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि प्रभागात नव्याने मतदान घेण्याची मागणी केली आहे, रेंगे म्हणाले.