नाशिक. Onion Price: या वर्षी खरेदी केलेल्या 1.2 लाख टन उन्हाळी कांद्यापैकी सुमारे 30% कांदा सडल्यामुळे आणि मोड आल्यामुळे आधीच खराब झाला आहे. दरम्यान, केंद्राच्या बफर स्टॉकमधून 500 टन कांदा घेऊन 'कांदा एक्सप्रेस' ही विशेष ट्रेन बुधवारी दुपारी 3.30 वाजता लासलगाववरून दिल्लीसाठी रवाना झाली. यामुळे दिल्लीकरांना कांद्याच्या महागाईबाबत थोडा दिलासा मिळाला आहे.
नाफेडच्या (Nafed) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती बिघडण्याचे मुख्य कारण म्हणजे काढणीच्या काळात झालेला अवकाळी पाऊस होता. यामुळे कांद्याची गुणवत्ता खराब झाली आणि त्याची साठवणूक क्षमता (शेल्फ-लाइफ) कमी होऊन दीर्घकाळ साठवणे कठीण झाले. सामान्यतः दरवर्षी सुमारे 20% कांदा खराब होतो, परंतु यंदा हा आकडा 40% पर्यंत पोहोचू शकतो.
'कांदा एक्सप्रेस' दिल्लीकडे रवाना
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, कांदा घेऊन जाणारी ट्रेन मंगळवारी सुटणार होती, परंतु ग्रेडिंग आणि सॉर्टिंगच्या (प्रतवारी) कामाला उशीर झाल्यामुळे ती सुमारे 24 तास उशिराने निघाली. लासलगाव रेल्वे स्टेशनचे स्टेशन मॅनेजर प्रीतिश दुबे म्हणाले, "कांदा एक्सप्रेस सुमारे 500 टन कांदा घेऊन लासलगाववरून निघाली असून 24 तासांच्या आत दिल्लीत पोहोचण्याची अपेक्षा आहे."
कांद्याच्या वाढत्या दरांवर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये
अनेक शहरांमध्ये कांद्याचे किरकोळ दर 50 ते 65 रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्यानंतर केंद्र सरकारने बाजारात हस्तक्षेप रेल्वेच्या माध्यमातून कांदा पोहोचवण्याची सेवा सुरू केली आहे. रेल्वे वाहतुकीव्यतिरिक्त केंद्र सरकार आपल्या नॅशनल ॲग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NAFED) आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन (NCCF) या खरेदी संस्थांच्या माध्यमातून रस्ते मार्गानेही कांदा पाठवत आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, नाफेडने मंगळवारी रात्री ट्रकमधून दिल्लीसाठी 30 टन कांदा पाठवला, तर एनसीसीएफने बुधवारी संध्याकाळी 30 टनांची दुसरी खेप पाठवली. सूत्रांनुसार, कोलकाता आणि चेन्नईसाठीही अशीच कांदा ट्रेन चालवण्याची योजना आखली जात आहे. अधिकारी जास्त खप असलेल्या भागात पुरवठा सुधारण्यासाठी आणि भाववाढ रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने आधीच घोषणा केली आहे की, 'कांदा एक्सप्रेस' उपक्रमांतर्गत आणलेला कांदा दिल्लीत नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भांडारच्या आउटलेट्सद्वारे 35 रुपये प्रतिकिलो या अनुदानित दराने विकला जाईल. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भविष्यात रेल्वेने चेन्नई, एरनाकुलम, मदुराई आणि गुवाहाटी येथेही कांदा पाठवला जाईल.
बफर स्टॉकवर ताण
केंद्राने उन्हाळ्यात 2 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु नाफेड आणि एनसीसीएफ मिळून केवळ 1.20 लाख टनच खरेदी करू शकले, जे लक्ष्यापेक्षा खूपच कमी आहे. या वर्षी बफर स्टॉकचा 90% पेक्षा जास्त भाग एकट्या नाशिक भागातून येण्याचा अंदाज आहे, जिथून सामान्यतः एकूण खरेदीचा 80% पेक्षा जास्त भाग येतो.
नाफेडच्या अधिकाऱ्याने सांगितले, "शेतकऱ्यांच्या साठवणुकीतील कांदा वेगाने संपत आहे आणि खरेदी केलेल्या मालापैकी 30% पीक सडल्यामुळे किंवा मोड आल्याने खराब झाले आहे, ज्यामुळे पुरवठ्याची स्थिती अधिक कठीण झाली आहे."
सामान्यतः शेतकरी सप्टेंबरपासून साठवलेला कांदा बाजारात आणण्यास सुरुवात करतात, परंतु या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी खराब होण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जून आणि जुलैमध्येच आपला साठा विकण्यास सुरुवात केली.
किती कांदा शिल्लक आहे?
कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, "याशिवाय घाऊक बाजारात चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकरी सरकारी खरेदी संस्थांऐवजी बाजाराकडे आकर्षित झाले." कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भारतातील सर्वात जास्त कांदा उत्पादक क्षेत्र असलेल्या नाशिक जिल्ह्यात सुमारे 24 लाख टन कांदा साठवण्याची क्षमता आहे, परंतु शेतकऱ्यांच्या स्वतःच्या गोदामांमध्ये एकूण साठ्याच्या केवळ 25% कांदा शिल्लक आहे.
कांदा सातत्याने खराब होत असल्याने आणि त्याची साठवणूक क्षमता कमी झाल्याने नवीन साठा येण्यापूर्वीच सध्याचा साठा संपू शकतो, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
खरीप हंगामातील कांद्याला विलंब झाल्याने पुरवठा घटण्याची भीती-
पेरणीच्या दिवसांत कमी पाऊस झाल्यामुळे खरीप कांद्याच्या पिकाला खूप उशीर होत आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात खरीप कांदा लागवडीचे सरासरी क्षेत्र सुमारे 30,000 हेक्टर आहे, तर आतापर्यंत केवळ 370 हेक्टरवरच खरीप कांद्याची रोपे लावली गेली आहेत. सामान्यतः या टप्प्यापर्यंत लागवडीचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण होते, परंतु सध्या केवळ 1% लागवड झाली आहे.
आता खरिपाचा नवीन कांदा नोव्हेंबरच्या मध्य्यापर्यंतच बाजारात येण्याची शक्यता आहे आणि नियमित आवक डिसेंबरच्या सुरुवातीपासून होण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये पुरवठा कमी होण्याची भीती वाटत आहे. सध्याचा साठा याच वेगाने कमी होत राहिला तर जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान कांद्याची टंचाई निर्माण होऊ शकते, असा इशारा कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
पुरवठ्यासाठी महत्त्वाचे पाच महिने
सध्या बाजार मुख्यत्वे मार्च आणि एप्रिलमध्ये काढणी झालेल्या उन्हाळी कांद्यावर अवलंबून आहे. सहसा या कांद्याची साठवणूक क्षमता सहा ते सात महिने असते आणि शेतकरी वर्षभर वेगवेगळ्या वेळी विक्रीसाठी हा कांदा साठवून ठेवतात.
कृषी विभागाच्या दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले, "खरीप पीक येईपर्यंत पुढील काही महिन्यांत कांद्याचे कोणतेही नवीन पीक येण्याची शक्यता नाही. या काळात घाऊक आणि किरकोळ बाजारात पुरवठ्यासाठी साठवलेला कांदा हाच मुख्य स्त्रोत आहे."
तथापि, व्यापाऱ्यांनी इशारा दिला आहे की, जास्त खराब झाल्यामुळे किंवा वेळेआधी साठा संपल्यामुळे सध्याच्या साठवणूक चक्रात अडथळा आला, तर पुरवठा आणखी कमी होऊ शकतो; ज्यामुळे येत्या काही महिन्यांत कांद्याच्या दरावर दबाव वाढू शकतो.
