डिजिटल डेस्क, नवी दिल्ली. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी नाशिकमध्ये 3.3 तीव्रतेचा भूकंप झाला. ज्यामुळे जिल्ह्यातील काही भागांतील घरांना तडे गेले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.

दरम्यान, शनिवारी ही या भागात 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू दिंडोरी तालुक्यातील भानवड गावाजवळ असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, वापी, सुरत आणि नाशिकमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

कोणत्याही मोठ्या जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीचे वृत्त नाही. मात्र, भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात घबराट पसरली असून, लोक आपापल्या घरातून बाहेर धावले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळील हातगड पर्वत रांगेनजीक असलेल्या भानवड भागात 5 किमी खोलीवर ही भूगर्भीय हालचाल नोंदवली गेली.

नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड, पेठ, दिंडोरी आणि निफाड तालुक्यांतील काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि ते घराबाहेर धावले.

सुरगाणा तालुक्यातील भादर आणि दिंडोरी तालुक्यातील नानशी येथील घरांच्या भिंतींना तडे गेल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच, परिसरातील धरणांचीही पाहणी करण्यात आली, परंतु त्यात कोणतेही नुकसान आढळले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

    "लोकांनी घाबरू नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तरीही, सर्वांनी सतर्क राहावे आणि सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी," असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

    यापूर्वी, 25 ते 28 जुलै आणि 6 ऑगस्ट रोजीही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के नोंदवले गेले होते.

    नाशिक आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही काळापासून पाऊस पडत आहे. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.